नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सलग दोन दिवस म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी सुसाट वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये हवामान विभागाने वादळाचा अलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामान बदलल्यानंतर मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत.उदयपूर आणि झालावड येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदयपूरमध्ये विजेचे जवळपास ८०० खांब आणि ७० ट्रान्सफॉर्मर कोसळले. अहमदाबाद, राजकोट, महेसाणा, साबरकांठा, आणंद भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या नैसर्गिक आपत्तीत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच मदत जाहीर करण्यात आली आहे.

एमपी, राजस्थान व गुजरातमध्ये पावसामुळे ३५ जणांचा बळी, मोदींच गुजरातसाठी मदतीचं ट्विट