वॉशिंग्टन डीसी : भारतानं कलम ३७० हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तान भारताविरोधात आक्रमक झाला असून, पाकिस्तानने बुधवारी (७ ऑगस्ट) भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. त्यानंतर आता अमेरिकेनंही त्यांना इशारा दिला आहे. पाकिस्ताननं भारताविरोधात आक्रमक होण्याऐवजी दहशतवादावर कारवाई करावी, असे खडे बोल पाकिस्तानला सुनावले आहेत.

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबंधांवर बुधवारी घाव घातला. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने रोखला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी अतिरेक्यांनी जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी आधीच राजनैतिक पातळीवरील संवाद थांबवला आहे, तर पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी व्यापारी संबंध रोखले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या ‘आक्रमक’ पवित्र्यातील हवा आधीच गेली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या सिव्हिल अ‍ॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये ६ ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलविली होती. या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतासोबत मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड केले जातील. याशिवाय, भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार संबंध तोडण्यात येतील. तसेच, बैठकीत भारतासोबत द्विपक्षीय संबंध व व्यवस्थांचा (समझौता) आढावा घेतला जाईल आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडला जाईल. याशिवाय, 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाकिस्तान साजरा करेल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

पाकिस्ताननं भारताविरोधात आक्रमक होण्यापेक्षा दहशतवादावर कारवाई करावी: अमेरिका