नवी दिल्ली : लोकसंख्येच्या बाबतीत पुढील ८ वर्षात म्हणजेच २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकणार असं संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या विभागाने The World Population 2019 : Highlights या नावे एक अहवाल सार्वजनिक केला आहे. ज्यामध्ये भारत हा २०२७ पर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून उदयास येऊ शकतो असं नमूद केलं आहे.

पुढील तीस वर्षात जगाच्या लोकसंख्येत तब्बल २ अब्जांपर्यंत वाढ होऊ शकते. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ही ७.७ अब्जांवरून थेट ९.७ अब्जांवर पोहचू शकते असं देखील संबंधित अहवालात नमूद करण्यात आलं आहे. २०५० या वर्षापर्यंत लोकसंख्येत जितकी वाढ होईल त्यापैकी अर्धी वाढ ही एकट्या भारत, नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया, टांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका या देशांमध्ये होण्याचा अंदाज देखील या अहवालात वर्तवण्यात आला आहे. दरम्यान स्वतः एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता २०११ च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज इतकी आहे तर चीनची लोकसंख्या १.३८ अब्ज इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला येत्या आठ वर्षात मागे टाकेल असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात भारतात या समस्येमुळे अनेक गंभीर समस्या देशभरात तोंड वर काढतील असं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यातील धोके ओळखून भारत सरकार लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमक्या काय उपाय योजना करणार ते पाहावं लागणार आहे.

लोकसंख्येच्या बाबतीत भारत येत्या ८ वर्षात चीनला मागे टाकणार: संयुक्त राष्ट्राचा अहवाल