कोल्हापूर: राज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले गिरीश महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा आविर्भावात फिरताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि पोलीसही या बोटीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता विरोधकांकडून त्यांना लक्ष करण्यात येत आहे.

सरकारकडे अजिबात संवेदनशीलता नाही. पुरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची गरज आहे. अनेक ठिकाणी एक इंचही जमीन राहिलेली नसून पाण्याने वेढलं आहे. नेत्यांना फिरायला हेलिकॉप्टर मिळतं, पण बचावकार्यासाठी मिळत नाही. तात्काळ लष्कराला पाचारण करायला हवं होतं, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. मदत केल्यानंतर बॅनरबाजी करत राजकारण केलं जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

पुरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर मिळत नाही, पण नेत्यांना फिरायला मिळतं: राजू शेट्टी