रत्नागिरी : मागील ५ वर्षे मुंबईत राहून सिंधुदुर्ग-रत्नागिरीच राजकारण पाहणारे खासदार विनायक राऊत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात दिसू लागल्याने आधीच त्यांचा मार्ग कठीण असल्याचं प्राथमिक निष्कर्षात समोर आलं होतं. विकासाचा मुद्दा घेऊन निवडून आले आणि ५ वर्ष दिसेनासे झालेले विनायक राऊत शेवटच्या क्षणी नारळ फोडण्याची स्टंटबाजी करताना कोकणवासीयांना दिसले. मात्र त्याच कोकणवासीयांना आणि स्थानिक शिवसैनिकांनी देखील चांगलाच हिसका दाखवला आहे.

लोकसभेसाठी पुन्हा मतांचा जोगवा मागण्यासाठी विनायक राऊत कधी नव्हे ते एका गावात अचानक उगवले. त्यांच्या या कार्यक्रमाची पूर्वकल्पना असूनही शिवसैनिकांनी सभेसाठी लोकांना आणण्याची तसदी घेतलीच नाही. त्यामुळे व्यासपीठावर ४०, तर पटांगणात ४ टाळकी असे अति विनोदी चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे अकार्यक्षम खासदारांचा मतदारांनी अशा अनोख्या पद्धतीने बदला घेतल्याने संपूर्ण मतदारसंघामध्ये ही सभा तुफान गाजली.

वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा या गावात राऊतांची सभा आयोजित केली होती. सभेचे अगोदरच नियोजन ठरले होते. पण गेल्या पाच वर्षांत खासदार राऊत या गावात एकदाही आले नव्हते. त्यांनी या ठिकाणी आजपर्यंत एकही विकासाचे काम केलेले नाही. एवढेच नव्हे तर, खासदार महाशय शोधूनही सापडणार नाहीत, अशी दुर्दैवी वेळ या गावक-यांवर आली होती. जशी स्थिती भुईबावडा गावात आहे, तसाच ठणाणा संपूर्ण रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात आहे. खासदार राऊत यांना भेटण्यासाठी यापूर्वी शिवसैनिकांनी अनेकदा प्रयत्न केले होते. पण राऊत सतत मुंबईतच ठाण मांडून असल्याने कोकणातल्या सामान्य शिवसैनिकांना ते कधीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या तोंडावर राऊत याच्या ‘कर्तबगारी’चा पद्धतशीर बदला घेण्याचा निश्चय शिवसैनिकांनी केला अन् भुईबावड्याच्या सभेत राऊतांना तोंडावर आपटवले.

विनायक राऊतांची वैभववाडीतील ही विराट प्रचार सभा त्यांचा निकाल सांगत आहे