कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली आहे. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपात प्रवेश दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत तसेच राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला त्यावेळी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. राणे जिथे जातील तिथे वाट लावतात, आधी काँग्रेसची आणि आता स्वत:ची विल्हेवाट लावली. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

शिवसेनेत होते त्यांना काढलं, काँग्रेसमध्ये होते त्यांना काढलं, आता शेवटचा पर्याय म्हणून ते भाजपात. हा लढा सुसंस्कृत आणि खुनशी प्रवृतीविरुद्ध आहे. ही पाठीत वार करणारी औलाद आहे. ज्या पक्षाला सोडून गेले, त्या पक्षाला राणेंचे शाप आहेत. माझ्या मित्राकडे खुनशी प्रवृत्तीची लोकं नको म्हणून भाजपाला सावध करतो आहे. मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हटल्यावर याला सातबारा कळतो का ? असे कोणीतरी म्हणाले. मी कोणाच्या जमिनी बळकावल्या नाहीत, जमिनी हडप केल्या नाहीत त्यामुळे मला सातबारा कळत नाही असे उद्धव म्हणाले.

आता स्वाभिमान शब्दही सर्वात खूश झाला असेल. वाकवली ती मान आणि म्हणे पक्ष स्वाभिमान. मी भाजपाला सावधानतेचा इशारा द्यायला आलो आहे, ही भुतं तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच मी टीका करायला आलो नाही तर मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत कसा बसू?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणे पिता-पुत्रांवर टीका केली आहे.

मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस, मला काय शिकवतोस अशा शब्दात उद्धव यांनी राणेंवर प्रहार केला. देवेंद्र फडणवीसांनी राणेंना पाच वर्ष थांबायला सांगाव बघा ते थांबतात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. भाजपाकडून भ्रम निरास झाल्यावर बघा हेच राणे काय बोलतात ते. गुंडगिरी मोडून तोडून टाकली म्हणून कोकण भगवं झालं असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस आणि मला काय शिकवतोस, उद्धव ठाकरेंचा राणेंवर प्रहार