नगर : सध्याच्या कॉर्पोरेट पद्धतीच्या राजकारणात पेड आणि मॅनेज प्रकार असणार हे साहजिकच आलं. नरेंद्र मोदींच्या बाबतीत देखील अनेक इव्हेंट’मधील घटनांना वास्तवात घडल्यासारखे दाखवून होकारात्मक हवा निर्मिती केल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळाले. त्यात नरेंद्र मोदींच्या परदेशात संपन्न झालेल्या इव्हेंटमध्ये मोदींना प्रश्न विचारणारे अनेक लोक हे भाजपचे पदाधिकारी असल्याचं उघड झालं होतं.
प्रशांत किशोर यांच्या मातोश्री भेटीनंतर आदित्य ठाकरे यांचे नियोजनबद्ध प्रोमोशन सुरु झाले यात काहीच वाद नाही. शिवसेनेत देखील बाळासाहेबांच्या पश्चात एका कंपनीवर माध्यमातून ठाकरे घराण्यातील व्यक्तीला प्रमोट करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. मुळात उद्धव ठाकरे यांना राजकारण कळत नाही असा विषय नव्हता पण भविष्यतील कॉर्पोरेट राजकारणाची पद्धत त्यांनी ओळखून नरेंद्र मोदी यांचा तोच प्रोमोशनचा फंडा प्रशांत किशोर यांच्या I-PAC कंपनीकडून विकत घेतला आणि जसाच्या तसा कॉपीपेस्ट करून आदित्य ठाकरे यांच्यावर अमलात आणण्यास सुरुवात केली.
मात्र मोदी जसे पूर्वनियोजित प्रकारांमुळे पकडले जाऊ लागले तसेच प्रकार सध्या आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत देखील घडताना दिसत आहेत. यात I-PAC कंपनी आणि त्यांचे प्रतिनिधी ज्या चुका मोदींच्या बाबतीत करताना दिसले त्याच चुका सध्या आदित्य ठाकरेंच्या ‘आदित्य संवाद’ या इव्हेंटदरम्यान करताना दिसत आहेत. संबंधित ठिकाणी शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी बसवले जात आहेत आणि प्रश्न विचारताना मात्र चिठ्यांमधून निवडक प्रकारे शिवसैनिक घुसवल्याचे नजरेस पडत आहे.
नगर येथील आदित्य संवाद दरम्यान संबंधित सभागृहात शाळेचे आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसविण्यात आले होते आणि त्यांच्या नावाच्या चिठ्या एकत्र करून, त्यामधील चिठ्या आदित्य ठाकरे यांना उचलण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर ‘ऋषिकेश काकडे’ नावाची चिट्ठी उचलण्यात आली त्याच्याकडे पाहता, तो शाळा किंवा कॉलेजचा विद्यार्थी तर वाटत नव्हता. मात्र व्यक्तीचा शोध घेतला असता तो शिवसैनिकच असल्याचं निष्पन्न झालं आहे, जो नगरचाच आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर देखील ‘माझं मत शिवसेनेला’ आणि शिवसेना संबंधित पोस्ट मागील अनेक वर्षांपासून टाकल्या आहेत. मराठा असल्याने उदयनराजे यांचा चाहता असणारा हा मूळ शिवसैनिक असल्याचं त्याच्या प्रोफाईलवरून उमगत आणि तोच व्यक्ती आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारताना दिसत आहे.
विशेष म्हणजे जेव्हा हा युवक त्याच्या नावाची चिट्ठी येताच आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिला. त्यानंतर राज्यातील प्लस्टिकबंदीवरून त्या युवकाला युवासेना आदित्य ठाकरे यांच्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही तर थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची झलक दिसत असल्याचं म्हणाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्या युवकाला उत्तर दिलं, मात्र एकूणच प्रश्न कोणता विचारावा आणि कोणी विचारावा तसेच त्या प्रश्नात भावनिक टच किती असावा हे देखील मॅनेज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
शिवसेनेचे आमदार-खासदार असलेल्या मतदारसंघातील शाळा, कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स मध्ये आदित्य ठाकरेंचे संवाद कार्यक्रम मोठयाप्रमाणावर आयोजित करण्यात आले, त्यामागील मूळ उद्देश आदित्य ठाकरेंचा चेहरा त्यांना परिचयाचा करून देणं हाच होता आणि त्यासाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंगसारखे गोड विषय त्याला जोडण्यात आले. त्यानंतर आदित्य संवाद आणि सध्या सुरु असलेला ‘जण आशीर्वाद’ दौरा देखील त्याच ‘मोदी कॉर्पोरेट ब्रॅण्डिंग’ प्रमाणेच असून, अनेक विषय आधीच संबंधित कंपनीने मॅनेज केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळेच काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोर यांचं प्रॉडक्ट असल्याचा खोचक टोला लगावला होता.
VIDEO : काय घडलं होतं नेमकं नगर येथील ‘आदित्य संवाद’ मध्ये?
