बेंगळुरू: ‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ म्हणून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असतानाच कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. ‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते, असा दावा हेगडे यांनी केला आहे. एखाद्या राज्याचं मंत्रिपद घेऊन त्याच राज्यातील जनतेच्या कामांसाठी आलेला केंद्रीय निधी पुन्हा केंद्राकडे वळविण्यासाठी तात्पुरतं मुख्यमंत्रीपद घेणारे फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री ठरतील अशी शक्यता भारतीय जनता पक्षाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या दाव्याने केली जाऊ लागली आहे.

वास्तविक एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री केंद्रातून अधिकाधिक निधी आणण्यासाठी स्वतः झटत असतो. मात्र अनंत कुमार हेडगे यांनी केलेल्या दाव्यातून, केंद्रातुन रचण्यात आलेल्या षढयंत्रात राज्यातील मुख्यमंत्री सामील होतो आणि राज्यातील जनतेच्या कामासाठी आलेला निधी पुन्हा केंद्राकडे वर्ग करण्यासाठी ३ दिवसांचा मुख्यमंत्री होतो आणि आदेश आल्याप्रमाणे काम उरकताच पुन्हा बहुमत नसल्याचा बहाणा करून राजीनामा देतो हे अत्यंत भीषण उदाहरण देशाच्या इतिहासात म्हणावे लागेल.

दरम्यान, अनंत कुमार हेगडे यांनी केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ही महाराष्ट्राची गद्दारी असल्याचं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर शरसंधान साधलं आहे.

हेगडे म्हणाले की “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी होता. जर राज्यात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले असते तर हा निधी त्यांच्याकडे गेला असता.” या निधीचा सरकारने गैरवापर केला असता असे म्हणत हेगडे यांनी तारे तोडले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला हा निधी विकासकामासाठी वापरता येऊ नये म्हणून हे सारे कुभांड रचण्यात आले होते असेही हेगडे म्हणाले. हे पैसे केंद्राकडे वळते करण्यासाठी फडणवीस यांना १५ तासांचा अवधी लागला असे हेगडे म्हणाले. निधी वाचवण्यासाठी हे सर्व राजकीय नाट्य केला असे दावाही त्यांनी केला.

त्याचसोबत ही योजना पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षाने बनवून ठेवली होती. शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये फडणवीसांनी केंद्राचे पैसे ज्याठिकाणी पोहचवायचे होते त्याठिकाणी पाठविले. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा सर्व पैसा वाचविला असल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.

मुख्यमंत्रीपद घेऊन त्याच राज्यातील जनतेविरुद्ध षढयंत्र रचनारे देशातील पहिले मुख्यमंत्री ठरतील?