महाबळेश्वर : उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठले असून महाबळेश्वर पूर्णपणे गारठून गेले आहे.
त्यामुळे पर्यटकांना सुद्धा गारव्याचा सुखद आनंद घेण्यास मिळत आहे. परंतु, थंडीमुळे हाल सुद्धा सोसावे लागत आहेत. असं असलं तरी शेतकऱ्यांना मात्र या थंडीचा प्रचंड फटका बसत आहे. दरम्यान गुलाबी थंडीने मुंबईकर देखील सुखावले आहेत. तर नाशिकमध्ये काल थंडीने गारठून दोन वृद्धांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अजून १ ते २ दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
