मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवबंधन बांधत शिवसेनेत दाखल झालेले राज्याचे माजी मंत्री आणि बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि विधान परिषदेचे पहिल्यांदाच सदस्य झालेले तसेच ‘महाराष्ट्राला भिकेला लावेन’ असं वादग्रस्त वक्तव्य करणारे तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने शिवसेनेच्या विशेषत: जमिनीवर पक्ष वाढवणाऱ्या विधानसभा सदस्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना दिसून आली. विधानसभा परिषदेचे आमदार तानाजी सावंत हे देखील करोडपती व्यक्तिमत्व असल्याने आयत्यावेळी काही मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली का अशी चर्चा देखील दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
‘मातोश्री’च्या निकट असलेले विधान परिषद सदस्य अनिल परब, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पदरी तसेच सेनेच्या ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक जुन्या आमदारांच्या नशिबी यंदा देखील निराशाच आली आहे. काल आलेल्या क्षीरसागरांना मंत्री करताना राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर असे निष्ठावंत वंचित राहिले. सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ.दीपक सावंत अशा विधान परिषद सदस्यांना पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मातोश्रीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी तानाजी सावंत विधान परिषदेचे सदस्य असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.
जातीपातीचा विचार शिवसेनेत होत नाही असे नेहमीच कौतुकाने म्हटले जाते. जयदत्त क्षीरसागर हे तेली समाजाचे आहेत आणि राष्ट्रवादीत येताच त्यांना शिवसेनेने कॅबिनेट मंत्री केले. क्षीरसागर यांचे तेली समाजात वजन असले तरी हा समाज मोठ्या प्रमाणात आज भारतीय जनता पक्षासोबत आहे. अशावेळी क्षीरसागर यांना संधी देताना कोणता निकष लावला असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ आमदाराने नाव न देण्याच्या अटीवर केला. क्षीरसागर आणि सावंत यांना मंत्रीपदे दिल्याने शिवसेनेच्या जमिनीवरील नेत्यांना मंत्रिपदापासून दूरच ठेवल्याने पक्षात छुपी खदखद सुरु झाल्याचे वृत्त आहे.
