माण: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माणमध्ये घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते भर पावसात सभा घेत आहेत. पण गावांमध्ये ठणठणाट आहे. तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेची चर्चा महाराष्ट्रात होत आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेवरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे. सत्तेत असताना ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते साताऱ्याच्या माणमध्ये बोलत होते.
सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणूकही होत आहे. या निवडणुकीत भाजपने उदयनराजेंना तिकीट दिलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की , जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा. समाजा समाजामध्ये भिंती उभ्या करायच्या. असे का करायचे? शिवरायांनी या भिंती तोडून मोडून टाकल्या होत्या आणि समाजाला एका पवित्र भगव्या झेंड्याखाली एकवटले होते. बारा मावळ एकवटल्यानंतर जी ताकद उभी राहिली ती महाराष्ट्र नाही देश नाही तर पूर्ण जगाचे डोळे दिपवणारी होती असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, पाणी हे काय समाज बघून देतात का? जे पाणी युती सरकार देईल हे माझ्या प्रत्येक बांधवांच्या घरामध्ये जाईल तेव्हा कोणताही समाज बघितला जाणार नाही. हे माझे वचन आहे. १० रुपयांमध्ये मी माझ्या गरीब जनतेला जेवण देणार म्हणजे देणारच. १ रुपयांमध्ये प्राथमिक आरोग्य चाचणी करणार म्हणजे करणारच. मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणजे करणारच. हा दुष्काळी भाग आहे पण मला माहिती आहे तुम्ही लढवय्या आहात असं सांगत शिवसेनेला मतदान करावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी या सभेत केलं.
