मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. राज ठाकरेंना दबावात ठेवण्यासाठी हे तंत्र वापरण्यात आलं आहे. पण माझा नवरा घाबरणार नाही. निवडणुका जवळ आल्याने माझ्या नवऱ्याला चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न आहे. मात्र चौकशीसाठी राज ठाकरेंना बोलविलं तर नक्की जाणार, सगळे पेपर त्यांना देऊ असं शर्मिला यांनी सांगितले आहे. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे सरकारचं आमच्यावर प्रेम आहे म्हणूनच नोटीस आली आहे असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भयंकर आहे. जो विरोधात बोलतो त्याच्याविरोधात ईडीचं, चौकशीचं हत्यार उगारलं जातं. परंतु, राज ठाकरे कुणालाच भीक घालत नाहीत आणि आम्हीही घाबरणारे नाही. ईडी-बीडीच्या दबावाने राज ठाकरेंवर फरक पडणार नाही, असा पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला आहे.

राज ठाकरे ईडी-बिडीला भीक घालत नाहीत: विद्या चव्हाण