बारामती: उदयनराजे भोसले यांनी एनसीपीच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सातारमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली. यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. उदयनराजेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने एनसीपी’साठी देखील ही लढाई प्रतिष्ठेची बनली. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारामध्ये सभा घेतली होती. धो धो पावसात पवारांच्या सभेची चर्चा राज्यभरात झाली. त्यानंतर उदयनराजेंचा दारुण पराभव झाला. यानंतर श्रीनिवास पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सातारकर जनतेचे आभार मानण्यासाठी मी स्वत: जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. पण हा कार्यक्रम त्यांनी रद्द केला.

‘मैत्रीपुढे ज्यांनी कशाचीच फिकिर केली नाही असे माझे सवंगडी आणि आता सातारा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये सत्कार करताना खूप समाधान वाटले. यानिमित्ताने आमच्या मैत्रीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा कार्यक्रम खरं तर साताऱ्यातच करण्याचे योजले होते, परंतु तेथील राजकीय परिस्थितीमुळे श्रीनिवास बारामतीत आले आणि हा हृद्य सोहळा संपन्न झाला,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

साताऱ्यातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यात, पवारांची मोठी रॅली आणि पावसातील सभा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे साताऱ्यातील एनसीपीचा विजय सोपा झाला. शरद पवारांचे मित्र असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला. त्यानंतर, शरद पवारांनी उद्याच मी साताऱ्याला जाऊन तेथील जनतेचे आभार मानणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळेंनीही याबाबत माहिती दिली होती. पवार विजयादिवशीचा साताऱ्याला जाणार होते, पण काही कारणास्तव दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचं सांगितलं. मात्र, पुन्हा दुसऱ्यादिवशीही पवारांनी सातारा दौरा रद्द केला. याउलट खासदार श्रीनिवास पाटीलच बारामती येथे पवारांच्या भेटीला आले.

सातारा दौरा रद्द करण्यावर शरद पवारांचा खुलासा