मुंबई: साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. एनसीपीने अन्याय केल्याचा पुर्नउच्चार उदयनराजे यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष प्रवेशावरून शरद पवार यांनी उदयनराजे यांना इतिहासाचा दाखला देत आरसा दाखवला आहे. “महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले. त्यानंतरही खचून न जाता त्यांनी स्वत: हिंदवी स्वराज्य निर्माण केलं”, असे खडेबोल शरद पवार यांनी उदयनराजेंना सुनावले.
उदयनराजेंच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशानंतर समाज माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. कित्येकांनी भारतीय जनता पक्षाला उदयनराजे आणि उदयनराजेंना भारतीय जनता पक्ष झेपणार नाही, अशा शब्दात या प्रवेशाचं विश्लेषण केलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही राज्याचे छत्रपती किती दिवस भाजपात राहतात हेच पाहायचंय, असे म्हणत त्यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशावर टीका केली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर, जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. तर, छगन भुजबळ यांनी राजे गेले पण मावळे आहेत, असे म्हणत उदयनराजेंच्या प्रवेशानंतरही कार्यकर्ते आमच्यासोबत असल्याचं दावा केला. त्यानंतर, आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही उदनयराजेच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशावर भाष्य केलंय.
महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांना मधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या! pic.twitter.com/jpmUS33GJS
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 15, 2019
