मुंबई : दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल काँग्रेस आणि एनसीपी दरम्यान बैठक पार पडली. या बैठकीत एकूण जागा वाटपा विषयी सविस्तर चर्चा झाली. दरम्यान यावेळी एनसीपीने विधानसभेसाठी एकूण जागांपैकी निम्म्या जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे आघाडीत बोलणी प्राथमिक स्तरावर असतानाच पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान या बैठकीमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ५०-५० टक्के जागा वाटप व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. दुसरीकडे काँग्रेसचा मात्र लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ होऊन त्यांचा केवळ एकच खासदार निवडून आला होता जो आयत्यावेळी सेनेतून आयात करण्यात आला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे कानाडोळा करत काँग्रेसने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार जागा वाटपाचे सूत्र असावे असा प्रस्ताव मांडला आहे. म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला मिळाव्या अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

दरम्यान, २०१४ साली काँग्रेसने जिंकलेल्या ४२ जागा आणि दुसऱ्या क्रमांकावरचे काँग्रेसचे ६४ उमेदवार, अशा १०६ जागा थेट मिळाव्यात. तर राष्ट्रवादीने जिंकलेल्या ४१ जागा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ५४ अशा एकूण ९५ जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या देशभर आणि विशेषकरून राज्यात काँग्रेसची अस्वस्था अत्यंत दयनीय असून त्यातुलनेत राष्ट्रवादी अधिक मजबूत आहे. उद्या काँग्रेस वास्तवाचं भान विसरून हट्ट करू लागल्यास राष्ट्रवादी देखील मनसे, स्वाभिमानी अशा पक्षांना एकत्र घेऊन वेगळी चूल मांडेल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे कशाप्रकारे बोलणी होतात ते पाहावं लागणार आहे.

जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता?