मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एकीकडे इतर पक्षांमधील नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात येत असतानाच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या या महाजनादेश यात्रेला एनसीपी’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार असून, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 6 ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे.

येत्या विधानसभा निवडणुकी आधीचं एनसीपीला मोठी गळती लागली आहे. अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे धाव घेतली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये एनसीपी’चं अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा नाजूक परिस्थितीतून पक्षाला सावरण्यासाठी शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढणार आहे.

मागील काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाने एनसीपी’ला मोठ्या प्रमाणावर खिंडार पाडले असून, एनसीपी’चे राज्यातील विविध भागामधील दिग्गज भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी एनसीपीकडून रणनीती आखण्यात येत असून, भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न एनसीपीकडून करण्यात येत आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू करण्यात येणार असून, कोल्हे यांच्या लोकप्रियतेमुळे ही यात्रा यशस्वी होईल अशी एनसीपीच्या नेत्यांना आशा आहे.

६ ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे. तर खुद्द अमोल कोल्हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. अमोल कोल्हे यांच्यावर एनसीपी’ची मोठी जबाबदारी आहे, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. त्यामुळे एनसीपी’ला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. तसेच सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या या यात्रेचा एनसीपी पक्षाला फायदा होणार आहे.

दुसरीकडे राज्य शासनाच्या ५ वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. ४३८४ किमीचा प्रवास करणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.

भाजप-सेनेच्या ‘महाजनादेश आणि जण आशीर्वाद’ यात्रेला ‘शिवस्वराज्य यात्रेने’ उत्तर