नवी दिल्ली : दोन महिन्यावर आलेल्या विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर महाजनादेश यात्रा काढणार आहेत. दरम्यान या यात्रेला भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार असल्याचे ऊत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात पक्ष सत्तेत असणं भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाचं असल्याने केंद्रातील वरिष्ठ नेत्यांचे देखील निवडणुकीच्या रणनीतीवर बारीक लक्ष आणि मार्गदर्शन देखील होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला एक ऑगस्टपासून अमरावतीतून सुरुवात होत आहे. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशी म्हणजे नाशिकमध्ये समारोप होणार आहे. त्यासाठी शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अशाच प्रकारच्या सध्या जणआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. त्यांच्या या यात्रेचा उत्तर महाराष्ट्रातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करत असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री काय बोलणार ते पाहावं लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला मोदी-शाह राहणार उपस्थित