मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून पावसाळ्यात देखील सर्व पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान आज राज्यातील भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीवेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर देखील उपस्थित होते.

हाती आलेल्या माहितीनुसार जवळपास १ तासांहून अधिक वेळ या दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीसोबत राहणार की राज्यात नवीन समीकरण तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान स्वभिमानीने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. ‘विधानसभेची निवडणूक महाआघाडीतून लढवायची की स्वबळावर, याचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र, ४९ जागांवर निवडणूक लढविणार आहे,’’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात केली.

स्वाभिमानीचे राजू शेट्टी व रविकांत तुपकर कृष्णकुंजवर, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा