येवला : शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील दौऱ्यात ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना आम्ही सरकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

येवला येथील सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारच तसेच आपला खरा देव हा लोकांच्या हृदयात, मनात असतो. जे शेतकरी बांधव मला आशीर्वाद देतात तो माझा खरा देव आहे. त्याच देवाला आज मी नमस्कार करायला निघालो आहे, हीच माझी खरी जनआशीर्वाद यात्रा आहे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, या सभेआधी आदित्य ठाकरेंची धान्य तुला करण्यात आली. या तुलेसाठी वापरण्यात आलेलं ६२ किलो धान्य, गोरगरिबांना वाटण्यात येणार आहे. मात्र असं असलं तरी सत्तेची ५ वर्ष पूर्ण होत आली असताना शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा प्रश्न अधांतरीच राहिल्याने विरोधकांनी टीका केली आहे. कारण शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि नेते मंडळींनी जाहीरपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे संपूर्ण कर्जमाफी झाल्याचा दावा केला होता. परंतु इथे आदित्य ठाकरे अजून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं असं सांगत असल्याने, दसरा मेळाव्यातील तो दावा खोटा होता का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं : आदित्य ठाकरे