
Bank Account Alert | रिझर्व्ह बँकेने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. आता ही बँक ग्राहकांचे जमा झालेले पैसे परत करू शकणार नाही. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ही बँक ग्राहकांना सेवा देण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने ज्या बँकेचा परवाना रद्द केला आहे, ती बँक म्हणजे कोल्हापूरयेथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे आणि कमाईचे साधन नसल्यामुळे हे पाऊल उचलले आहे. आरबीआयने 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करण्याचे आदेश बँकेला दिले आहेत.
शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर ४ डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यासोबतच पेमेंट करणे आणि बँकेत पैसे जमा करण्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
या निर्णयाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, या सहकारी बँकेकडे बँकिंग सेवा देण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. त्याचबरोबर भविष्यात उत्पन्नाच्या साधनांबाबत कोणतीही ठोस योजना सादर करण्यात बँकेला अपयश आले आहे. अशा तऱ्हेने रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन होत नसल्याने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?
रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केल्याने बँकेत जमा झालेल्या ग्राहकांच्या पैशांचे काय होणार, असा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत ठेवीदारांना आता विमा व पतहमी महामंडळाचा (डीआयसीजीसी) आधार मिळाला आहे. याअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना त्यांचे जमा केलेले पैसे परत केले जातील, पण कडक अटींसह.
ठेवीदारांना विमा व पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) प्रत्येक बँकेत पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर बँकेच्या ग्राहकांना विमा संरक्षण मिळते. डीआयसीजीसी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) उपकंपनी आहे जी पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा देते.
अशा तऱ्हेने ज्या ग्राहकांच्या या बँकेत ठेवीची रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. पण ज्या ग्राहकांच्या ठेवीची रक्कम पाच लाखरुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना फक्त पाच लाख रुपये दिले जातील आणि उरलेले पैसे गमावले जातील. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की या 5 लाख रुपयांमध्ये मुद्दल आणि व्याज या दोन्हींचा समावेश आहे.
या बँकांवरही कारवाई
रिझर्व्ह बँक सातत्याने कठोर भूमिका घेत आहे. बँकांच्या आर्थिक आरोग्याची सातत्याने तपासणी केली जाते. या प्रकरणात नियमांचे पालन न केल्याने अनेक बँकांना मोठा दंडही ठोठावण्यात आला होता. यामध्ये आरबीआयने एचडीएफसी बँक सह तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. याशिवाय जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेड, श्री लक्ष्मी कृपा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि चेंबूर नागरी सहकारी बँक लिमिटेड यांनाही आरबीआयने दंड ठोठावला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.