
Inflation in India | मुंबईत आता गुरुवारपासून सुटं दूध प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे. जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे. हरभरा सारख्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. परिणामी याचा फटका दूध उत्पादकांना बसताना दिसत आहे. यामुळे दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
दिवाळीपर्यंत महागाई अजून वाढणार :
एकीकडे दूध महागलं असताना आता दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा हा फराळही महागणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाली असून ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहील असं लहान मोठे व्यापारी सांगत आहेत.
अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यावरूनही हे स्पष्ट झाले :
वास्तविक गेल्या आठ वर्षातील महागाईने उच्चांक गाठला हे डोळे उघडे ठेवून बघितले की दिसतेच. ते सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने १२ मे २२ रोजी अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यावरूनही हे स्पष्ट झाले होते. पेट्रोल, गॅस, खाद्यपदार्थ, दूध, भाजीपाला, औषधे यासह साऱ्याच वस्तू कमालीच्या महाग होत आहेत. सरकारी नितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपया घसरतो आहे आणि भारतीय पातळीवरही महागाईने रुपया कवडीमोल होतो आहे. अच्छे दिन, सबका साथ सबका विकास, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, दरवर्षी दोन कोटी रोजगार, नोटबंदीने काळापैसा खतम वगैरे भोंगळ, भ्रामक, मनमानी, अशास्त्रीय भाषण बाजीचे पिळत आता पुन्हा पुन्हा उघडे पडत आहे. पण यात करोडो सर्वसामान्य भरडले जात आहेत. आणि हो निवडणुकीसाठी जी ८०/२० ची धर्मांध, घटनाद्रोही मांडणी करणाऱ्यांनी यात ऐंशी टक्केवालेही भरडले जात आहेत हे लक्षात घ्यावे.
आठ वर्षात सरासरी दुप्पट महागाई झाली :
अवघ्या आठ वर्षात सरासरी दुप्पट महागाई झाली आहे. विरोधी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीविरोधात व महागाई विरोधात आक्रोश करते आहे. पण सरकार त्याबाबत ब्र ही काढत नाही. समाज माध्यमातूनही त्याबाबत जाब विचारणे सुरू आहे पण समाज माध्यमांच्या जीवावरच निवडून आलेल्या सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. या सरकारने गेल्या आठ वर्षात सरासरी दर सहा महिन्यांनी म्हणजे तेरा वेळा अबकारी करात वाढ केली आहे. इंधनावर अवाजवी कर लादून लाखो कोटी रुपये सामान्यांकडून लुटले आहेत. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर न बोलणे हा बदल सत्तापिपासा कशी व किती विचारभ्रष्ट करते याचे उदाहरण आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही यामुळे अंधभक्तही याबाबत स्वतःशी चरफडत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.