
Onion Price Hike | कांद्याचे भाव वाढण्याच्या भीतीने देशांतर्गत उपलब्धता वाढविण्यासाठी मोदी सरकारने शनिवारी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लादले. सरकारी आकडेवारीनुसार पहिल्यांदाच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनिवारी दिल्लीत कांद्याचा किरकोळ विक्री दर ३७ रुपये किलोवर पोहोचला. तर गेल्या तीन आठवड्यांत देशातील २७५ शहरांमध्ये कांद्याचे दर किलोमागे १९ रुपयांनी वाढले आहेत.
कांदा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील
कांदा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी महत्त्वाची मानली जात आहे. अर्थ मंत्रालयाने सीमाशुल्क अधिसूचनेद्वारे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ४ ऑगस्ट या कालावधीत देशातून ९.७५ लाख टन कांदा निर्यात झाला आहे. मूल्याच्या दृष्टीने बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन आयातदार आहेत.
केंद्र सरकारने काय कारण दिले?
ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काळात निर्यातीत झपाट्याने वाढ झाल्याचेही निदर्शनास येत आहे.
कांद्याचे दर 63 रुपये किलोवर
कांदा निर्यातीला आळा घालण्यासाठी सरकारने नेहमीच किमान निर्यात मूल्याचा वापर केला होता. मात्र, यंदा प्रथमच निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी राष्ट्रीय स्तरावर कांद्याचा सरासरी किरकोळ भाव ३०.७२ रुपये प्रति किलो होता. कमाल भाव ६३ रुपये किलो तर किमान दर १० रुपये किलो होता. आकडेवारीनुसार, शनिवारी दिल्लीत कांद्याचे दर ३७ रुपये प्रति किलो होते.
कांदा का महाग होत आहे?
क्षेत्र घटल्याच्या बातम्यांमुळे कांद्याचे दर वाढू लागले आहेत. सरकारने यंदा तीन लाख टन कांद्याचा बफर स्टॉक ठेवला आहे. गेल्या आठवड्यापासून घाऊक बाजारात प्रमुख ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दिल्ली, आसाम, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या घाऊक बाजारात दोन हजार टन बफर कांद्याची विक्री झाली आहे. बफर कांद्याचा वापर साधारणत: ऑगस्ट आणि सप्टेंबर पासून ऑक्टोबरमध्ये नवीन पीक येईपर्यंत केला जातो.