
Tomato Price Hike | २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी महागाई कमी करण्याचं लोकांना वचन देत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. पण त्यानंतर गॅस सिलेंडरचा दर तिप्पट महाग झाला तर पेट्रोल-डिझेलच्या दरांनी विक्रम मोडले आहेत. परिणामी उत्पादकांचा मालवाहतूक खर्च प्रचंड वाढल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. विशेष म्हणजे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजी-पाल्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
मात्र नरेंद्र मोदी आता सामान्य लोकांशी निगडित महागाई आणि बेरोजगारी या विषयांचा साधा उच्चार देखील करत नाही. मात्र आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने हिंदू-मुस्लिम वाद आणि त्यासंबंधित बातम्या जोर धरू लागल्या आहेत आणि त्यावर भाजपाची नेतेमंडळी समाज माध्यमांवर कार्यरत झाली आहेत. आता टोमॅटोचा दर अजून विक्रम रचण्याच्या दिशेने जातं आहे. एकीकडे महागाईच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आणि त्यात निसर्गाचा घाला अशा दुहेरी कात्रीत मतदार अडकला आहे.
महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत भाज्यांचे दर ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचतील, असा अंदाज घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आवक कमी झाल्याने टोमॅटोच्या घाऊक दरात वाढ झाल्याचे घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचा परिणाम किरकोळ किमतीतील वाढीच्या स्वरूपात दिसू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीतील आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अशोक कौशिक म्हणाले, “अतिवृष्टीमुळे उत्पादक भागातील पिकांचे नुकसान झाल्याने गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो १६० रुपयांवरून २२० रुपयांपर्यंत वाढले असून, त्यामुळे किरकोळ दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.
टोमॅटो, शिमला मिरची व इतर हंगामी भाज्यांची विक्री मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाला घाऊक व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. प्रमुख उत्पादक भागात मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने महिनाभरापासून टोमॅटोचे दर वाढत आहेत.
आझादपूर भाजी मार्केटचे घाऊक व्यापारी संजय भगत म्हणाले, “हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे भाजीपाला वाहतुकीत खूप अडचण येत आहे. उत्पादकांकडून भाजीपाला आणण्यासाठी नेहमीपेक्षा सहा ते आठ तास जास्त लागत आहेत. अशा परिस्थितीत टोमॅटोचे दर ३०० रुपये किलोच्या आसपास पोहोचू शकतात.
हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या टोमॅटो आणि इतर भाज्यांचा दर्जा घसरला आहे. हिमाचल प्रदेशात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
मदर डेअरीचा उपक्रम :
दरम्यान मदर डेअरी आपल्या सफल स्टोअर्सच्या माध्यमातून २५९ रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करत आहे. केंद्र सरकार १४ जुलैपासून सवलतीच्या दरात टोमॅटो ची विक्री करत आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानीतील किरकोळ किमतीत घसरण झाली होती, परंतु पुरवठ्यात कमतरता असल्याने किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.
आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अनिल मल्होत्रा म्हणाले की, बाजारात टोमॅटोचा पुरवठा आणि मागणी दोन्ही कमी असून विक्रेत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भाजीपाला वाहतुकीस उशीर होणे, गुणवत्ता बिघडणे अशा अडचणी विक्रेत्यांना भेडसावत आहेत. याशिवाय टोमॅटो, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी अशा भाज्या खरेदी करण्यास ग्राहक टाळाटाळ करीत आहेत.
किरकोळ किंमत किती आहे?
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार बुधवारी टोमॅटोचा किरकोळ भाव २०३ रुपये किलोवर पोहोचला, तर मदर डेअरीच्या सफल स्टोअरमध्ये २५९ रुपये किलो होता. आशियातील सर्वात मोठी घाऊक फळे व भाजीपाला बाजार असलेल्या आझादपूर मंडईत बुधवारी टोमॅटोचे घाऊक दर गुणवत्तेनुसार १७० ते २२० रुपये प्रति किलो होते.