नवी दिल्ली: महाराष्ट्रातून दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांना बोलावण्यात आले आहे. दिल्लीच्या नरेला विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी भाजप उमेदवार नीलदमन खत्री यांच्यासाठी प्रचार रॅली काढली. यावेळी हिंदीतून भाषण करतांना पंकजा मुंडे यांनी ” ये झाडू वाली सरकार इस बार दिल्लीसे साफ कर दो’, दिल्ली इस देश का ताज है, उसे मोदीजी के सरपर रखवा दो’ असे आवाहन पंकजा मुंडे करतांना दिसत आहेत.

मतदारांना आपली ओळख करून देतांना पंकजा म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाची मी सामान्य कार्यकर्ती आहे, जेव्हा भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला, तेव्हाच माझा जन्म झाला, म्हणून माझे नाव देखील पंकजा ठेवण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल टाकतच मी राजकारणात काम करते आहे. महाराष्ट्रात विरोधकाला पराभूत करून गाडण्याचा आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा मला खूप अनुभव आहे, आमची त्यात पीएचडी झाली आहे. म्हणूनच कदाचित मला दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्षाला घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंड मधील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. त्यासाठी देशभरातील तब्बल २००, खासदार, ७० केंद्रीय मंत्री आणि ११ विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहेत. यावर हे सर्वजण आप’ पक्षाला हरवण्यासाठी मुक्काम ठोकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. समाज माध्यमांसह विविध ठिकाणी आप’द्वारे भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

तत्पूर्वी, प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्यावर देखील प्रचाराची आणि सभांची जवाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी दिल्लीला दाखल झाले होते. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली होती. विनोद तावडेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा महाराष्ट्रातील चावडी सभांपेक्षा देखील कमी असल्याने त्यांच्यावर समाज माध्यमांवर टीका देखील करण्यात आली होती.

त्यावर अरविंद केजरीवाल यांनी एक ट्विट करून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली होती. केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, ‘विनोद तावडे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रात १३०० सरकारी शाळा बंद केल्या आहेत. ते आता दिल्लीत भाजपचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. माझ्या दिल्लीवासीयांनो, तुम्ही खूप मेहनत करून सरकारी शाळा चांगल्या बनवल्या आहेत. ते आले की त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दर्शन करून त्यांची रवानगी करा. ते आपले पाहूणे आहेत, अशा शब्दात केजरीवाल यांनी विनोद तावडे यांच्यावर टीका केली होती.

 

Web Title:  BJP Leader Pankaja Munde in Delhi for Assembly Election for Election 2020 Campaign.

त्या परळीत पराभूत झाल्या; दिल्ली प्रचारात म्हणाल्या मला विरोधकांना पराभूत करण्याचा अनुभव