मुंबई : काही महिन्यांपूर्वी ‘मुंबई रिव्हर अँथम’ गाण्यातील जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका सुद्धा करण्यात आली होती. कारण, केवळ जाहिरातबाजी करणाऱ्या सरकारकडून प्रत्यक्ष नद्यांच्या प्रदूषणात घट करण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर काहीच होताना दिसत नाही. त्याच्या पुरावा आता समोर आला आहे. कारण, जाहिरातीत स्वतःची चमकोगिरी करून, प्रत्यक्ष जमिनीवर लोकांच्या तसेच स्थानिकांच्या प्रबोधनासाठी काहीच होताना दिसत नाही.
राज्यातील तब्बल ५३ नद्या प्रदूषित असून, गोदावरी, मिठी, मोरना, वैनगंगा या सर्वांत प्रदूषित आहेत, तर पंचगंगा, उमोडी आणि वशिष्टी नद्या स्नानास योग्य असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. बीओडी’चे प्रमाण ३ पेक्षा जास्त असल्यास पाणी अत्यंत प्रदूषित मानले जाते. राज्यातील नद्यांत बीओडीचे प्रमाण ३ ते ३० पर्यंत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते गोदावरी, मिठी, मोरना, वैनगंगा या सर्वाधिक प्रदूषित नद्या आहेत. तर भीमा, कालु, कुंडलिका, मुठा नद्या त्याखालोखाल असून, त्यानंतर इंद्रायणी, कन्हन, मुळा, मुळा-मुठा, पवना, पेढी, पूर्णा, वर्धा यांचा क्रमांक लागतो.
तुलनेने कमी प्रदूषित नद्यांत दारणा, गिरणा, गोमाई, कान, कोलार, कृष्णा, नीरा, पांझरा, पातळगंगा, पेनगंगा, रंगावली, सीना, तापी, तितूर, वेल तर त्याहून कमी प्रदूषित नद्यांत अंबा, भातसा, बिंदूसार, बोरी, चंद्रभागा, घोड, हिवरा, कोयना, मांजरा, मोर, पेल्हार, सावित्री, सूर्या, तानसा, उल्हास, वैतरणा, वेण्णा, वाघूर या नद्या आहेत. दरम्यान, पंचगंगेत सातत्याने सांडपाणी सोडले जात आहे. जी नदी वाहती असते; त्या नदीत प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. पंचगंगेचा विचार करता जेथे शहराचे, गावाचे सांडपाणी नदीत सोडले जाते आहे, त्या ठिकाणी प्रदूषण आढळते. इचलकरंजीपासून पुढील भागात प्रदूषणाची समस्या आहे. इचलकरंजीपर्यंत मागील वर्षी फारसे प्रदूषण आढळले नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे देण्यात आली.
