मुंबई : मुंबईत हाय अलर्ट असताना, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयाच्या दूरध्वनीवर ‘दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा’, अशा धमकीच्या कॉलने एकच खळबळ उडाली. या कॉलनंतर मुंबईत कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, तपासात हा कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे समजताच मुंबई शाखेने त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. शुभमकुमार पाल (२२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने विद्यार्थ्याची चौकशी सुरु आहे.

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्यावतीने एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील दुकानदारांना दुकाने उघडी न ठेवण्याची आणि टॅक्सी चालकांना टॅक्सी न चालवण्याची धमकी दिली आहे. याशिवाय, येथील स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याची धमकी दिली आहे. याचबरोबर, येथील शाळांना सुद्धा दहशतवाद्यांनी इशारा दिला आहे. कुठल्याही रस्त्यावर मुली शाळेत जाताना दिसता कामा नये, अन्यथा त्यांना धोक्याचा सामना करावा लागेल, असे दहशतवाद्यांनी म्हटले आहे.

दरम्यान भारताने ३७० कलम रद्द करून काश्मीरची स्वायत्तता काढताच पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. आर्थिक कंगालीमुळे पाकिस्तान भारताशी युद्ध करू शकत नाही. त्यामुळेच पंतप्रधान इम्रान खान यांनी फतवा काढला की, जगाने करो वा न करो यापुढे आपण काश्मिरींच्या पाठीशी उभे राहायचे. त्यासाठी दर शुक्रवारी १२ ते १२.३० हा अर्धा तास शाळा, कॉलेज, कार्यालयांतील नागरिकांनी सर्व कामे थांबवून जिथे असाल तिथे थांबायचे आहे. याला ‘काश्मिरी अवर’ असे म्हटले जाईल.

हिजबुलची काश्मीर खोऱ्यात धमकी; तर मुंबई-गुजरातमध्ये हायअलर्ट