मुंबई: महाराष्ट्रातील महाविद्यालयामध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे. १९ फेब्रुवारीपासून सर्व महाविद्यालयांना हा आदेश लागू होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. या नियमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना निर्माण होण्यास मदत होईल, असेही सामंत यांनी म्हटले आहे.

शाळांप्रमाणेच महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्येही राष्ट्रगीत गुंजणार हे निश्चित झालं आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शिवजयंतीपासून होईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचे निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यास सर्वच महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सामंत यांनी पुढे नमूद केले.

या निर्णयामुळे दरदिवशी १५ लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील. असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं हे पहिलं राज्य आहे.”खुल्या विद्यापीठांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घ्यायची असा निर्णय आज आम्ही घेतला. सर्वांची मागणी होती की, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांशी संवाद होण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी दर तीन महिन्यांनी एक बैठक व्हावी, या बैठकीला मंत्री म्हणून मी मान्यता दिली आहे.

 

Web Title: Maharashtra state government to make singing National Anthem in colleges compulsory from 19th February 2020.

महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे