मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली रेल्वेसेवा आसपासच्या शहरांमधील प्रवाशांचा देखील दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. दरम्यान याच सेवेचा लाभ घेणाऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील वाढती लोकसभा आणि त्या तुलनेत रेल्वेच्या कमी फेऱ्या देखील त्यामागील मुख्य कारण आहे. मात्र त्यात विशेष अडचणी या महिलावर्गाला आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रत्यक्ष रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेऊन मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांचे विविध प्रश्न आणि समस्यांबाबत चर्चा करून त्यावर उपाययोजना सुचविणार असल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी देखील अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष मुंबई लोकलने प्रवास करून सामान्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. एल्फिन्स्टन दुर्घटनेदरम्यान अनेक निरपराध मुंबईकरांचा जीव गेला होता आणि त्यावेळी स्वतः राज ठाकरे यांनी प्रवाशांच्या प्रश्नाला हात घालून सरकारला फैलावर घेतले होते. त्यात पावसाळ्यामध्ये प्रवासादरम्यान अपघातांचे प्रमाण अधिकच वाढते आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या समस्येसोबत इतरही अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमित ठाकरे यांच्या नैतृवाखाली एक शिष्टमंडळ रेल्वे महाव्यवस्थापकांच्या भेटीला पाठविण्याचा निर्णय घेतला होता. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या भेटीबाबत अधिक तपशील प्राप्त होईल.
