मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने ठाण्यात एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण चौगुले असे या आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे. मनसैनिक चांगलेच खवळले असून ते सत्ताधारी भाजपावर सुडाच्या राजकारणाचा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची काय भूमिका आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी ईडीच्या चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून त्याबाबतची नोटीसही देण्यात आली आहे. त्यानंतर, मनसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर, विरोधी पक्षातील नेत्यांनीही राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. राज ठाकरेंच्या ईडी चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मात्र याबाबत जास्त बोलण्यासही उद्धव ठाकरेंनी नकार दिला.
दरम्यान, मनसे आणि राज ठाकरे यांच्या संदर्भात नेहमीच नकारात्मक भूमिका घेणारे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भूमिकेवर महाराष्ट्र सैनिकांची समाज माध्यमांवर वेगळीच चर्चा रंगली आहे. राज ठाकरेंना वाढता पाठिंबा पाहून उद्धव ठाकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली असल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच अशा परिस्थितीत त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली असती तर त्यांच्यावरील संशय बळावला असता, कारण संकटाच्या काळात सर्व मतभेद बाजूला ठेऊन राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावून गेल्याचे सर्वश्रुत आहे.
