मुंबई: जागतिक मंदीचे परिणाम देशावर होऊ नये यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल करून कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधिची घोषणा खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे देशात बाहेरील कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्यासाठी सवलत मिळणार आहे. तसेच अंतरराष्ट्रीय ट्रेड वॉरचा फायदा भारताला मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राला ही मोठा फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि मोदी सरकारचे आभार मानले आहेत. उद्योग जगतासाठी घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले. याचा नक्कीच देशातील कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. 3 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बजेटमध्ये सादर केले ते फायद्याचे आणि आता जे निर्णय घेतलेत ते अधिक फायद्याचे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन याचा जास्त फायदा महाराष्ट्राला होणार आहे. कार्पोरेट टॅक्सच्या निर्णयामुळे रि इन्व्हेस्टमेंटमध्ये अधिक नोकऱ्या तयार होतील. ज्यामुळे बेरोजगारांना याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या नवीन गुंतवणूक येणार आहेत. त्या नवीन गुंतवणूकिला १५ टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय हा महत्वाचा ठरणार आहे. यामुळे २०२३ मध्ये प्रोडक्शनमध्ये जायचे असेल तर सगळी गुंगवणूक ही २०१९, २०२० आणि फार फार तर २०२१ मध्ये करावी लागेल. तसेच गेल्या काही महिन्यामध्ये नवीन सरकारने अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे १० बँकाचे ४ बँकामध्ये विलीनीकरण हा देखील एक मोठा निर्णय महत्वाचा आहे.

कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने उद्योगांना फायदा: मुख्यमंत्री