मुंबई: भाजप-शिवसेनेची युती होणार हे आता निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः युतीची घोषणा एक दोन दिवसांत होणार असल्याचं सांगितले आहे. शिवसेनेकडून मुंबईमध्ये आयोजित प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी माझं आणि अमित शहाचं चांगलं बोलणं सुरु आहे, युतीची घोषणा आज-उद्यामध्ये होईल, असं त्यांनी सांगितले आहे.

५३ वर्षांत शिवसेना सत्तेत राहिली नाही, मात्र आमच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष असते. एकदिवस महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मी एकदिवस नक्की मुख्यमंत्री बनवणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला चुचकारले आहे. मात्र दुसरीकडे भाजपसोबत युती होणार यावर देखील शिक्कामोर्तब केले आहे.

ज्या जागांवर भाजपचा उमेदवार असेल तिथे त्यांना पाठिबा देऊ., जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे ते आपल्याला साथ देतील. उमेदवारी मिळाली नाही, म्हणून कोणीही गद्दारी करू नये, असा सल्ला ठाकर यांनी दिला आहे. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष युतीच्या घोषणेकडे लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे….

  1. तमाम शिवसैनिक बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो. रंगशारदा मध्ये भेटल्याशिवाय निवडणूक असल्यासारखे वाटत नाही.
  2. राजकीय भाषणंपेक्षा मी तुमच्याशी कौटुंबिक भाषण करणार आहे. कारण तुम्ही माझे कुटुंब आहात.
  3. शिवसैनिक प्रमुखांनी माझ्याकडे तुमच्यासारखे सोबती दिलेल्या आहेत असे जगाच्या पाठीवर कुठेही नाहीत.
  4. माझा तर पक्षच पितृपक्ष आहे. पूर्वजांची आशीर्वाद असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का ?
  5. पूर्वजांची पुण्याई माझ्या मागे आहे म्हणून माझ्या मागे इतक्या लोकांचे प्रेम आहे.
  6. महाराष्ट्रात बरीच संकटे येतात जसे पूर वगैरे पण माझे शिवसैनिक स्वतःला झोकून देऊन त्यामध्ये काम करत असतात. शेवटी मला दम द्यावा लागतो की बाबा जरा आराम कर.
  7. मला कोणाबद्दल वाईट बोलण्यात अजिबात आनंद वाटत नाहीत.
  8. कोणी जर सूड उगवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगारल्याशिवाय राहणार नाही.
  9. शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टा समोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी न्यायमूर्तींना विचारले सांगा माझा गुन्हा काय ?
  10. १९९२-९३ साली झालेल्या दंगलीमध्ये हिंदूंचे रक्षण करणे हा गुन्हा आहे का ?
  11. तुमच्यासारख्या मर्दानी आज हिंदूंचे रक्षण केले.
  12. मला यावेळी विधानसभेत सत्ता हवी आहे.
  13. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढत राहण्यासाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली.
  14. गेली पाच वर्षे संघर्षाची होती त्यामध्ये तुम्ही माझ्या नेहमीसोबत राहिलात यासाठी सुद्धा आभार मानण्यासाठी मी तुम्हाला बोलवले आहे.
  15. नंदकुमार यांनी रक्ताने लिहिले होते की, मी मेलो तरी भगवा सोडणार नाही. असे शिवसैनिक आपल्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेसोबत लढत आहेत.
  16. शेतकऱ्यांना फक्त मी कर्ज मुक्तच नाही तर पूर्ण चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही.
  17. सर्व इच्छुकांना सांगत आहे की, एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसल्याशिवाय राहणार नाही असे मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलेले आहे.
  18. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे.
  19. युतीची घोषणा लवकरच होईल.
  20. वैर केलं तर आम्ही उघडपणे करतो आणि जर यूती केली तर आम्ही पाठीमागून सुरा मारत नाही अशी आमची अवलाद नाही.
  21. शिवसेनेची स्थापना ही कोणताही मुहूर्त किंवा काळ वेळ बघून झाली नाही.
  22. प्रत्येक मतदार संघामध्ये मला शिवसेना पाहिजे.
  23. युती झाली तर जिथे भाजप असेल तर आपली ताकद त्यांच्यासोबत आणि जिथे शिवसेना असेल तिथे भाजपची ताकद नेहमीच सोबत असायला हवी.
  24. शेतकरी आणि गोरगरिबांची प्रश्नाने सोडवायचे असतील तर एकत्रित पणे काम करावे लागेल.
  25. ज्या जागा आपल्या वाट्याला येतील तिथे आपली निवडणुकीची तयारी झालेली असली पाहिजे.
  26. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत कपट कारस्थान आमच्याकडे नाही आणि गनिमी कावा हा गनिमासाठी आहे.
  27. जर माझे शिवसैनिक माझ्या सोबत असतील आणि माझ्यावर त्यांचा विश्वास आहे तर मला हवा तसा टर्न मी मारीन.
  28. मला हात वर करून वचन द्या की आम्ही शिवसेनेशी आणि भगव्याशी इमान राखू.
  29. निवडणुकीसाठी उमेदवार निवड हा माझ्यासाठी फार कठीण काळ असतो.

मी शेतकऱ्यांना कर्ज मुक्त आणि चिंतामुक्त केल्याशिवाय राहणार नाही: उद्धव ठाकरे