मुंबई: शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वाजतगाजत रोड शो केला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. शिवसैनिकांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह दिसत होता. आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदित्य ठाकरे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. दरम्यान, अर्ज भरण्यापूर्वी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना फोन करून आशीर्वाद दिला. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी विधानसभेची जागा सोडली. आदित्य म्हणाले, ‘मी केवळ वरळी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करेन. मी जिंकणार असा मला विश्वास आहे, कारण तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत.’
उद्धव ठाकरे म्हणाले की, वरळीच्या जनतेच्या आदित्यचा स्वीकार केला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्यापर्यंत निवडणूक न लढविण्याची आमच्या कुटुंबाची परंपरा होती. मात्र आता नवीन पिढी आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे विचार नवे आहेत. तरुणांच्या विचारानेच देश आणि राज्य पुढे जावे ही जनतेची इच्छा आहे, असे ठाकरे म्हणाले. आमची परंपरा जनतेची सेवा करण्याची आहे. ती पुढच्या पिढीत देखील कायम आहे. आम्ही निवडणूक न लढवता सेवा केली मात्र ही आजची नवी पिढी आहे. आदित्यासोबत तुमचा आशीर्वाद कायम राहिलं, हा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
