मुंबई: राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना काल रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केली आहे.
शिवसेनेचे ५६ आमदार अधिक शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबणार आहेत. दरम्यान, काळजीवाहू सरकारची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने सत्तास्थापनेचा पेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना सोडवावाच लागणार आहे. त्यादृष्टीने आज हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, रात्री उशिरा युवासेना अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रंगशारदा हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व शिवसेना आणि समर्थक अपक्ष आमदारांची हॉटेलमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट दिली आणि परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर आज नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार ते पाहावं लागणार आहे.
Mumbai: Shiv Sena leader Aditya Thackeray leaves from Hotel Rangsharda after meeting the party MLAs staying there. https://t.co/iYISCx0Von pic.twitter.com/uUVaHl1RHg
— ANI (@ANI) November 7, 2019
या कालच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरींनी भाजपाचं म्हणणं कसं योग्य आहे, हे पटवून देण्याचा काल प्रयत्न केला होता. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून आलेत आणि शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री होत असतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. थोडक्यात, भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपदावर तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचंच त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि राज्याच्या हिताचा मार्ग लवकरच निघेल, असंही त्यांनी नमूद केलं.
मुंबईत सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे. तो सुटत नसताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हालचाली सुरू झाल्या होत्या. मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री नागपुरात दाखल झाले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांना सत्तासंघर्षाची माहिती दिली. त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काल एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालकांना भेटणार होते. स्वर्गीय विलास फडणवीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘जिव्हाळा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजता सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात होणार होता. तिथे दोघेही उपस्थित राहणार आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष लागले होते, परंतु काहीच हाती लागलं नाही.
दरम्यान, शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या घडामोडींशी संबंधित असलेल्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने मुंबई मिररने हे वृत्त दिले होते.
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. घोडेबाजाराच्या घाडेरडया राजकारणात पडू नका. दीर्घकाळाचा विचार करता भारतीय जनता पक्षासाठी ते हिताचे राहणार नाही असे भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.
