नागपूर: शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. सध्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. ज्यावेळी त्यावर काही ठोस निर्णय होईल, त्यावेळी फॉर्म्युला सर्वासमोर उघड केला जाईल,” असं पवार यावेळी म्हणाले.

मिळालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १४ मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळतील.

दरम्यान आमची चर्चा फक्त शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये सुरु असून भारतीय जनता पक्षाशी आम्ही संपर्क केलेला नाही”, असा महत्त्वपूर्ण खुलासा शरद पवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शरद पवार यांनी दोन दिवस नागपूर मधील दौरा केल्यानंतर नुकसान भरपाई बाबात उपाययोजना सुचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सरकारस्थापनेबाबतही महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत.

सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार