हैदराबाद : तेलंगणात मतदानाला काही तास उरले असताना काल सकाळी तेलंगणात पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ३ कोटी रुपये जप्त केले. सदर प्रकरणी एकूण ८ जणांना पोलिसांनी विभागाने ताब्यात घेतलं आहे. असं असलं तरी प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम कर्नाटकातून आली असल्याचे पोलिसांनी मत व्यक्त केले आहे. पण पकडण्यात आलेली रक्कम कोणत्या पक्षाशी संबंधित आहे का? यावर काही माहिती समजू शकलेली नाही.
प्रथमता सराफ आणि हिरे व्यापाऱ्यांची ही रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु नीट विचार करता हे सत्य नसल्याचं पोलिसांना वाटत आहे. कारण सराफ आणि हिरे व्यापारी एवढी मोठी रक्कम निवडणुकांच्या काळात कधीच खुलेआम पाठवत नाहीत. त्यांच्या अनुभवानुसार ते त्यांच्याकडील काळा असो व पांढरा पैसा तो ते निवडणुकीच्या काळात कधीच पाठवत नाहीत. त्यामुळे ही रक्कम नक्कीच मतदारांना वाटण्यासाठीच आल्याचे पोलिसांना वाटत आहे.
दरम्यान, ही पकडण्यात आलेली रक्कम केवळ ३ कोटी पर्यंत मर्यादित नसून, आतापर्यंत तेलंगणात तब्बल १२० कोटी रुपये अशाच पद्धतीने एकत्रित कारवाईत जप्त करण्यात निवडणूक यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेला यश आले आहे. विशेष म्हणजे तेलंगणात विधानसभेच्या एकूण ११९ जागा आहेत आणि पकडण्यात आलेली रक्कम १२० कोटी रुपये आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक कोटींपेक्षा अधिक काळा पैसा आला आहे. परंतु ही केवळ पकडली गेलेली रक्कम आहे, मग हाताला न लागलेली रक्कम किती असेल याचा अंदाज येतो आहे.
मध्य प्रदेशातील मतदान आधीच २९ कोटी आणि राजस्थानात ३५ कोटी पकडण्यात आले होते. त्यामुळे नोटबंदीचा काळ्यापैशावर किती परिणाम झाला याचा अंदाज येतो.
