अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या विषयाला अनुसरून आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी शिवसेना नेत्यांना आणि उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. ‘या नेत्यांना प्रभू रामापेक्षा केवळ राजकारणात अधिक रस आहे’, अशा शब्दात खडे बोल सुनावले आहेत.
सध्या उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे नेते अयोध्येत दौरे करत आहेत. परंतु, शिवसेनेच्या या दौऱ्यानिमित्त आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेना आणि शिवसनेच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, “या नेत्यांना प्रभू रामापेक्षा राजकारणातच अधिक रस आहे. या दोन्ही संघटना (म्हणजे शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद) स्वत:चा प्रचार तसेच केवळ राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहेत”, असा थेट आरोप केला.
विहिंप तर्फे सुद्धा २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जर हिंदुत्ववादी संघटना तसेच राजकीय पक्षांचा मंदिर निर्माण करणे हा खरंच मुख्य हेतू असता, तर त्यांनी स्वतःचे जाहीर आणि स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजीत केले असते का?. या दोन्ही संघटनांच्या अशा जाहीर कार्यक्रमातून मंदिर बांधण्याचा तोडगा निघणार नाही, असा स्पष्ट दावा सुद्धा त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला. तसेच आखाड्याशी संबंधित साधू- संत शिवसेना आणि विहिंप’च्या जाहीर कार्यक्रमात अजिबात सहभागी होणार नाहीत, हे सुद्धा स्पष्ट केले.
