नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येते आहे. तस तसे राजकीय समोर येणारे अंदाजित आकडेवारी सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. त्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा स्वतःची ताकद अजमावण्यासाठी पक्षांतर्गत सर्व्हेसुद्धा करून घेतला आहे. मात्र, या सर्व्हेमुळे भाजपाची झोप उडाली आहे. कारण भारतीय जनता पक्षाला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हिंदी पट्ट्यातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एकूण जांगांमध्ये मोठी घट होणार आहे, असे निष्कर्ष त्यात नमूद करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त भाजपच्या गोटातून प्रसार माध्यमांकडे आले आहे.
त्यात धक्कादायक म्हणजे भारतीय जनता पक्षाला युपीमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता यात वर्तविण्यात आली आहे. भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार, यूपीत भाजपाला ५१ जागांचं नुकसान होणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपानं दमदार विजय प्राप्त करत यूपीत ८० पैकी तब्बल ७१ जागा जिंकल्या होत्या. परंतु भाजपाच्या नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार यूपीत पक्षाला केवळ २० जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. कारण, यूपीत बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीची झालेली आघाडी ही भारतीय जनता पक्षाच्या जागा घटवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.तसेच युपीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या आघाडीमुळे यंदा देशाचं राजकीय चित्र पूर्णतः बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
या आघाडीनंतर लोकसभा निवडणुकीत युपीत समाजवादी पक्ष हा बसपा पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. त्यात काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी प्रियंका गांधी यांना साक्रीय राजकारणात उतरवले आहे. तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी अजून वाढली आहे.
