नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार आणि CBI मधील संघर्ष अद्याप सुरूच असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कारण, आज सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी सुप्रीम कोर्टात त्यांच्या बदलीला आव्हान दिलं आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि नीरव मोदीच्या पीएनबी बँकेतील घोटाळ्याची चौकशी थांबवण्यासाठी माझी बदली नागपुर येथे करण्यात आली, असा आरोप त्यांनी केल्याने खळबळ माजली आहे.

त्यामुळे माझ्या बदलीचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी सिन्हा यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. नीरव मोदी या हिरे व्यापाऱ्याने केलेला पीएनबी बँकेतील करोडो रुपयांचा घोटाळा आणि त्यानंतर सुद्धा सुखरूप देशाबाहेर पलायन करण्यात त्याला आलेलं यश यामुळे विरोधकांनी मोदी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यात CBI चे विशेष संचालक राकेश अस्थान यांच्यावर याआधीच लाचखोरीचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या पथकात मनीष कुमार सिन्हा यांचा सुद्धा समावेश होता. परंतु, त्याचदरम्यान नागपुर येथे माझी बदली करण्यात आली आणि त्यामुळेच त्या बदलीला आवाहन देणारी याचिका त्यांनी कोर्टात दाखल केली आहे.

त्यात CJI रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाकडे मनीष कुमार सिन्हा यांनी याचिका दाखल केली आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचा सुद्धा समावेश आहे. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे हेच घटनापीठ CBI अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी घेणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा मिळाला असून त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

cbi dig manish kumar sinha filed petition at supreme court against his transfer to nagpur to disturb nirav modis case