पणजी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यात नेतृत्वबदलाबाबत भाष्य करुन भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणले आहे. दरम्यान, गोव्यात भाजप नेतृत्व बदल करणार नाही, असे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी आधीच स्पष्ट केले होते. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आजाराने ग्रासले आहे. परंतु, अशा परिस्थितीत सुद्धा ते राज्याचं काम करत आहेत.

परंतु असं असलं तरी आज नाहीतर उद्या गोव्यात नेतृत्वबदल हा करावाच लागेल आणि ही काळाची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केले आहे. मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जून महिन्यापासून ते मुख्यमंत्री कार्यालयात पाऊल ठेवण्यास असमर्थ ठरले आहेत.

अशा राजकीय पेचात गोवा काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला होता. तसेच थेट मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे हयात असल्याचे दाखवा, अन्यथा त्यांचं श्राध्द घाला असं आव्हानच राज्य काँग्रेसने दिले होते. त्यानंतर काँग्रेसच्या प्रतिक्रियेनंतर गोवा राज्य भाजपाने मनोहर पर्रिकर यांचे निवासस्थानी बैठक घेतानाचे फोटो सर्वत्र प्रकाशित केले होते. या छायाचित्रांमध्ये मनोहर पर्रिकर मंत्र्यांसोबत चर्चा करताना दिसत होते.

change in goa leadership is requirement of today or tomorrow says union minister shripad naik