जयपूर : राहुल गांधी सध्या राजस्थान विधानसभेच्या अनुषंगाने राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल विमान खरेदीवरून जोरदार हल्ला चढवला असून त्यामागील वास्तव काय ते मोदी संसदेत बोलायचं टाळतात असा घणाघात केला आहे.
मोदींचे बिझनेसमन परम मित्र अनिल अंबानी यांच्या कंपनीला स्वतः पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक मदत केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. दरम्यान अनिल अंबानींनी सर्व आरोप या पूर्वीच फेटाळले असून आमच्या त्या व्यवहारात सरकारची काहीच भूमिका नव्हती असं स्पष्टीकरण दिल होत.
मोदी सरकार आल्यावर २०१५ मध्येच फ्रान्सकडून तब्बल ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा करार केला होता. परंतु त्या राफेल लढाऊ विमानांची बांधणी परदेशात होणार असल्याने भारतातील अनेक तरुणांनी रोजगार गमावला असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. पुढे राहुल गांधी म्हणाले की, आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास चीन इतकीच आहे, परंतु लोकसंख्येच्या तुलनेत भारतात प्रतिदिन केवळ ४५० लोकांना रोजगार प्राप्त होतो. दुसरीकडे आपला शेजारी आणि प्रतिस्पर्धी देश चीन दर दिवसाला ५० हजार लोकांना रोजगार मिळवून देतो, जी आपल्यासाठी शरमेची गोष्ट आहे असं राहुल गांधी म्हणाले.
