जालना : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेनेत युती झाली खरी, परंतु आता ही युती शिवसेनेच्या अंगलट येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेतून थेट मंत्री पदावर असलेले नेतेच फुटण्यास सुरुवात झाली आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर मंत्री अर्जुन खोतकर यांनी युती झाली तरी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंच्या विरोधात रणशिंग फुंकणार असल्याचे सूचित केले होते. परंतु त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांना भेट नाकारली होती. त्यानंतर अर्जुन खोतकर देखील संतापल्याचे समजते.
त्यानंतर, जालनातील भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे विरूद्ध शिवसेनेचे नेते आणि राज्यामंत्री अर्जुन खोतकर या वादाचा फायदा घेण्याची काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आहे. अर्जुन खोतकर यांना काँग्रेस पक्षात घेण्सासाठी चाचपणी सुरू असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या सूत्रांकडून समजले आहे. दिल्लीतील काँग्रेस ज्येष्ठ नेत्यांनी खोतकर काँग्रेस पक्षातील हालचाली याबाबत दिला दुजोरा दिला आहे. खोतकर यांना “हात” देत युतीत वाद वाढवण्याची शक्यता आहे. खोतकर यांनी यापुर्वीच रावसाहेब दानवे विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. दानवे – खोतकर वाद विकोपाला गेल्याचा राजकीय फायदा काँग्रेस करून घेण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सेनेला रामराम केल्यानंतर शिवसेनेत फुटीचे सत्र सुरु होण्याची शंका राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यात अनेक पण पक्ष नैतृत्वावरच टीका करून पक्ष सोडतील असं म्हटलं जात आहे.
