ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा राज्याच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर गेले की, ‘युती गेली खड्ड्यात’, अशा घोषणा देतात. त्यानंतर मुंबईत पोहोचले की पाठच्या दाराने गुपचूप मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकसंदर्भात युतीची चर्चा सुरु करतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भर सभेत केली.

त्याचवेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे म्हणजे सत्तेच्या गुळाच्या ढेपेला चिकटून बसलेला मुंगळा आहे, अशा बोचरी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला लक्ष केले आहे. एनसीपीने सध्या सत्ताधाऱ्यांन विरुद्ध रान उठविण्यासाठी निर्धार परिवर्तन यात्रा सुरु केली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित या मेळाव्यास अजित पवार, जयंत पाटील, ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, महिला आघाडीच्या चित्रा वाघ, आ. जितेंद्र आव्हाड, माजी खा. आनंद परांजपे व संजीव नाईक आदी वरिष्ठ नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, कुठलाही घटक शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या कामाविषयी जराही समाधानी नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागील ५ दिवस सुरू आहे. परंतु, जण सामान्यांचे हाल होत असताना त्यात लक्ष घालायला मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना जराही वेळ नाही. वर्षानुवर्षे या दोन्ही पक्षांची सत्ता असलेल्या बेस्टचा कामगार वर्ग अजिबात समाधानी नाही, तो सामान्य लोकांना काय सेवा देणार? ठाणे, कल्याण-डोेंबिवली महापालिकांसह ‘बेस्ट’मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. तसेच या तिन्ही महापालिकांत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. परिवहनखात्याचे मंत्री पद सुद्धा दिवाकर रावते आहेत. ते ‘शिवशाही’च्या नावाने एसटी बस चालवत आहेत. त्या शिवशाहीला दिवसाढवळ्या आग लागते. सर्वच स्तरांवर हे दोन्ही पक्ष अक्षरशः अपयशी ठरले आहेत अशी टीका पवारांनी भाषणादरम्यान केली.

former deputy chief minister ajit pawar criticised udhav thackeray