मुंबई : मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं असता उपस्थितांना संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. तसेच लोकसभेत अविश्वास प्रस्तावावेळी रंगलेल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा त्यांनी नेमकं बोट ठेवलं.
संसदेतील अविश्वास दर्शक ठरावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, संसदेत अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या भाषणातून सर्वकाही चांगल्या प्रकारे जिंकलं होतं. मात्र, त्यांनी ते डोळे मिचकावणं केलं नसतं तर जरा बरं झालं असतं. नेमकी तिथेच काँग्रेस अध्यक्षांनी थोडी गडबड केली आणि त्यामुळेच राहुल गांधींच्या कृतीत गांभीर्य नसल्याची टीका करण्याची संधी सगळ्यांना मिळाली.
तसेच शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले की, सत्तेत सामील असलेल्या शिवसेना नेत्यांची भाजपाकडून अवहेलना केली जात असल्याने शिवसेनेचे मंत्री तसेच आमदार प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे सध्या ते सगळे संभ्रामवस्थेत असून काय करावं हे त्यांना सुचत नाहीए. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असं राजकीय भाकित सुद्धा अजित पवारांनी वर्तवले आहे.
दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार पुढे म्हणाले की, पक्षात प्रत्येकाला मान-सन्मान द्यायला विसरू नका. पक्षातील अनेकांना असे वाटते की आपल्याला कोणी ओळखत नाही. परंतु, त्यांनी असे वाटून घेण्याचे कारण नाही, त्याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच हीच तुमची ओळख आहे. काहींना पक्षात पदे मिळाल्यानंतर त्यांच्याकडून स्वत:चे आर्थिक फायदे साधण्याचे प्रकार घडतात. पण यामुळे शेवटी पक्षच बदनाम होतो. त्यामुळे यापुढे पक्षात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, अशा रोखठोक शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या उपस्थित कार्यकर्त्यांना सुनावले. तसेच यंदा नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देण्याचा मानस सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
या कार्यकर्त्यांच्या शिबिराला पक्षाचे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एनसीपी महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान, उपाध्यक्ष नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
