नवी दिल्ली : ८०च्या दशकात दूरगामी परिमाण करणारी मोठी स्वप्न बघून राजीव गांधी यांनी भारतातील दूरसंचार आणि तंत्रज्ञानाचा खरा अर्थाने पाया रचला होता. केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, लसीकरण, साक्षरता, खाद्यतेल, टेलिकॉम आणि डेअरी विकास याला सुद्धा तंत्रज्ञानाच्या मोहिमे सोबत जोडायला सुरुवात झाली होती.
त्यांनी भविष्यकाळ ओळखून पर्यावरण, गृहनिर्माण, पूर आणि दुष्काळ या मोहिमांना नियोजनाचे स्वरूप देऊन ‘भारत कनेक्ट’ करण्यासाठी दूरसंचारला महत्व प्राप्त करून देण्यास सुरुवात केली होती. त्यांनीच टेलिकॉम क्रांतीचा देशात खरा प्रवास सुरु केला तो १९८३ मध्ये आणि त्यासाठी राजीव गांधींनी पुढाकार सुद्धा घेतला होता. त्यावेळी भविष्यातील महत्व ओळखून डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रवेश, ग्रामीण टेलिकॉम, स्वदेशी विकास, स्थानिक उत्पादन, उद्योग आणि तरुणाच्या कार्य क्षमतेवर लक्ष केंद्रित करणं ही भविष्याची गरज होती हे त्यांनी अचूक ओळखलं होत.
भारताच्या टेलिकॉम आणि कनेक्टिव्हिटीमध्ये राजीव गांधींनी बीज रोवली, त्यामुळेच आज भारतातील करोडो लोक ४ जी ५ जी’च्या माध्यमातून कनेक्ट झाली असून खऱ्या अर्थाने टेलिकॉम तंत्रज्ञानाचा आनंद लुटत आहेत. आज त्यांनी रोवलेल्या बीजांमुळेच सॉफ्टवेअर निर्यातीत भारताची एक जागतिक ओळख निर्माण झाली आहे आणि तोच भारताला खऱ्या अर्थाने परकीय गंगाजळी देणारा विषय ठरला आहे.
त्यांच्याच प्रयत्नातून देशाची ७५ टक्के जनता साक्षरतेच्या माध्यमातून समृद्ध होत होती. खाजगीकरण, उदारीकरण, मुक्त बाजार अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणातून भारताला फायदा होताना दिसत होता. जागतिक पातळीवर त्यावेळी चर्चा रंगली होती ती राजीव गांधी युगाचीच. २१ व्या शतकात एक मजबूत, शक्तिशाली भारत तयार करण्यासाठी राजीव गांधींनी मोठी पावलं उचलली होती आणि त्यात टेलिकॉम हा मोठा घटक होता. टेलिमॅटिक्स विकास केंद्र, टेलिकॉम आयोग, तंत्रज्ञान मिशन, माहिती तंत्रज्ञान, अंदाज आणि मूल्यांकन परिषद (TIFAC), प्रगत संगणन विकास (ग्रॅम-DAC) केंद्र ही त्यातील काही उदाहरण. त्यांच्याच कार्यकाळात देशांतर्गत क्षमतेचा खरा उपयोग करून पुण्यात भारतातील पहिला सुपर कॉम्प्यूटर विकसित करण्यात आला.
राजीव गांधींचा कार्यकाळ समजून घेतला तर ते आत्मविश्वास बाळगणारे खूप साधे, नम्र, स्पष्ट, सक्षम, प्रतिबद्ध आणि धैर्यवान व्यक्तिमत्व होते. आज कोणीही डिजिटल इंडियाची स्वप्न दाखवत असेल तरी खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाचे शिल्पकार म्हणजे माजी पंतप्रधान राजीव गांधी हेच आहेत.
