पणजी : गोव्यात लोकसभा निवडणुकीआधी परप्रांतीयांच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याला अनुसरून गोव्याचे विद्यमान पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केलेल्या एका विधानानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. गोव्यातील नोकऱ्यांमध्ये परप्रांतीय, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांना स्थान दिले जाणार नाही. केवळ गोव्यातील लोकांनाच इथे प्राधान्य दिले जाईल, असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय मुद्दा तापण्याची चिन्ह आहे.
त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर गोव्यात स्थलांतरित कामगारांना अजिबात स्थान मिळणार नाही. त्यात विशेष करून महाराष्ट्रातील लोकांना यापुढे नोकऱ्या दिल्या जाणार नाहीत, असे पर्यटनमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सरकारची भूमिका मांडली.
सध्या गोव्यात सरकारकडून बंदरे स्वच्छ करण्याच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्याला कुणाला या निविदा प्रक्रियेत यश येऊन काम मिळेल, त्याने केवळ गोव्यातील लोकांना संबंधित नोकरीत प्रथम स्थान दिले पाहिजे. महाराष्ट्रातील लोकं येथे येता कामा नयेत असे त्यांनी विशेष भर देऊन सांगितले.
दरम्यान, त्यांनी याबाबत थेट ‘घाटी’ हा शब्द वापरल्यावर तो जाणीवपूर्वक आणि बदनामीकारक आहे असे काही प्रसार माध्यमांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर ते म्हणाले, की हा काही वाईट शब्द नाही. याचा अर्थ जे लोक घाटावर राहतात ते लोक इतकाच आहे.
