नवी दिल्ली : पुलवामा भ्याड हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तानमधील परिस्थिती नाजूक झालेली असताना आता शांतीवार्ता सुरु होण्याचे अनेक प्रकार पुढे येऊ लागले आहेत आणि तणाव कमी करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा महत्वाचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. कारण विषयाला अनुसरून चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत भेटीवर येणार असल्याचे वृत्त आहे.
शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव हे आपल्या जीवनाच्या कार्याच्या शेवटच्या काळात सध्या पाकिस्तानात असलेल्या कर्तारपूर गुरुद्वार दरबार साहिबपर्यंत भारतीयांना दर्शनासाठी जाता यावे यासाठी भारतातील भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात जाता येणार आहे. सदर विषयाला अनुसरून दोन्ही देशांमध्ये करारावर १४ मार्च रोजी सह्या होणार असल्याचे समजते. त्यासाठी पाकिस्तानचे एक पथक नवी दिल्लीला येणार आहे. कारण तशी पाकिस्तानकडून अधिकृतरित्या माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते महंम्मद फैझल यांनी भारताचे उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी तशी माहिती दिली. त्याचबरोबर भारतालाही या कॉरिडॉर संबंधी चर्चेसाठी पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. १५२२ साली गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्व आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून चार किलोमीटर लांब पाकिस्तानात स्थित आहे.
