मुंबई : मुंबईमधील मराठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं अधोरेखित करत, सरकार येथील जमिनी इंच इंच विकू याच उद्देशाने धोरण राबवत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमधील वांद्रा येथील शासकीय वसाहतीला भेट देऊन त्यांनी इथल्या समस्या समजून घेतल्या तसेच नंतर स्थानिकांना संबोधित सुद्धा केले.
पुनर्विकासाच्या नावाने वांद्रा येथील शासकीय वसाहतीमधील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सरकारच्या एकूणच हालचाली या मुंबईमधून मराठी माणसाचं अस्तित्वच संपविण्यासाठी आहेत असा थेट आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. पुनर्विकासाच्या नावाखाली इथल्या स्थानिक लोकांना घरं खाली करायला सांगितली जात आहेत. परंतु इथल्या नागरिकांचा त्याला ठाम विरोध आहे. त्याच लोकांना धीर देण्यासाठी आणि आश्वस्त करण्यासाठी राज ठाकरे यांनी या वसाहतीला भेट दिली.
इथल्या स्थानिक मराठी माणसाला बाहेर हुसकावून नंतर तिथे परप्रांतियांना वसवण्याचा शिष्ठबद्ध प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी लोकांना सूचित केलं आहे. कोणतीही सरकार आलं तरी सामान्य मराठी माणसाच्या संबंधित धोरणात काही बदल होत नाहीत असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले. परंतु वांद्रे शासकीय वसाहतीतील लोकांना वचन देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘तुम्ही व तुमच्या पुढच्या पिढ्या वांद्रयातच राहणार हा माझा शब्द आहे’ त्यामुळे स्थानिकांमध्ये एक आशा जागी झाल्याच चित्र पाहायला मिळालं.
