ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि धुलीवंदनाच्या निमित्ताने मनसे आणि राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेतेमंडळी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सध्या शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटींनी राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असताना, दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या देखील या ना त्या निमित्ताने वाढताना दिसत आहेत.
त्यामुळे लोकसभेत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले जात आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून येत्या २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू असे जाहीर केले आहे. अविनाश जाधव आणि आनंद परांजपे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले असून शिवसेनेला ही निवडणूक आता फारशी सोपी नसल्याचे, अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने यावेळी या अशा सणाला राजकीय रंग चढला आहे. राज ठाकरे यांनी या आधीच आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून अद्याप कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच रंग लावून आपला एकच रंग असल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे मनसेने आयोजित केलेल्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात आनंद परांजपे यांना निमंत्रित करण्यात आले.
