मुजफ्फरपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उत्तर भारतीय पंचायत ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून हिंदीतून भाषण केले. त्यानंतर देशभर त्यांनी साधलेल्या या हिंदी भाषेतील संवादाची चर्चा रंगली आहे. परंतु आता त्यांच्या या भाषणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आल्याचे वृत्त आहे.
संबंधित भाषणादरम्यान त्यांनी हिंदी भाषेचा अपमान केला, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुजफ्फरपूरचे सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाश्मी यांनी राज ठाकरेंविरोधात मुख्यन्यायाधीश आरती कुमारी सिंह यांच्या न्यायालयापुढे ही याचिका दाखल केली. सदर याचिकेवर १२ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी होणार आहे असे समजते.
या भाषणावेळी उपस्थितांना संबोधित करताना “हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही”, असे जाहीर वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे राज ठाकरे यांनी हिंदी भाषेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून भाषेचा अपमान केला असल्याचे याचिकेत म्हटले आहे. वास्तविक हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा नाही आणि सरकार दफ्तरी तसा कोणताही पुरावा नाही, अशी माहिती याआधी अनेकवेळा माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. त्याचाच आधार घेऊन राज ठाकरे यांनी ते वक्तव्य केल्याचे समजते. त्यामुळे या याचिकेमागे केवळ वाद निर्माण करण्याचा उद्देश असावा, असं राजकीय विश्लेषकांना प्रथम दर्शनी वाटतं आहे.
