तिरुपूर: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींनी देशभर प्रचार सुरु केला आहे. त्यानिमित्त मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘मी पंतप्रधान म्हणून अपयशी ठरलो असं म्हणता, मग माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज का भासते, असा सवाल मोदींनी विरोधकांना विचारला. विरोधकांची महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याचा पुनरुच्चार नरेंद्र मोदींनी यावेळी केला. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच महाआघाडी केली जात असल्याचा आरोप त्यांनी सभेदरम्यान केला. त्यांचा प्रयत्न तामिळनाडूसह देशातील जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये त्यांची सभा पार पडली.

दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेससह, द्रमुक पक्षावर देखील सडकून टीका केली. परंतु, त्यांनी राज्यातील सत्ताधारी अण्णाद्रमुकवर टीका न करता दक्षिणेत मित्र जोडण्याचा मार्ग अवलंबला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, मोदींनी जनसभा घेतलेल्या तिरुपूरमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण प्रचंड आहे.

नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा, त्यांच्या सभेचा फायदा भारतीय जनता पक्षाला तिरुपूरसह आसपासच्या अनेक भागात होऊ शकतो. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या सभेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी उपस्थित होते. यावेळी दोघांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. यानंतर हे दोन्ही नेते कोईम्बतूर विमानतळावरही भेटले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि अण्णाद्रमुकमध्ये आघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

PM narendra modi rally at tirpur in Tamilnadu state